धक्कादायक!भर वस्तीत पार पडतात आहेत अंत्यविधी!
शुक्ला नगरच्या शिवमंदिरात दशक्रिया व तेरवी!परिसरातच लटकवले अस्थीकळस!
वस्तीतील नागरिक दहशतीत,एनआयटीने केले मोकळे रान
नागपूर,ता. ७ मे: करोना हा नागपूर शहराला आणखी काय-काय दाखवेल याचा काहीच नेम नाही,आज ओंकार नगर जवळील शुक्ला नगरच्या शिवमंदिर परिसरात तेथील गुप्ता नावाच्या एका रहीवाश्याने चक्क तेरवीची विधी पार पाडली.तीन दिवसांपूर्वीच त्यांनी या ठिकणी दहावीची क्रिया पार पाडली एवढंच काय कमी होते की त्यांनी त्यांच्या घरातील मृतकाच्या अस्थिी देखील तेथील शिवमंदिर परिसरात टांगून ठेवल्या होत्या…..!आता हे मृतक करोना बाधित होते कीवा नाही,याची मात्र तेथील रहीवाश्यांना कल्पना नाही.
हिंदू समाजामध्ये अंत्यविधी संबंधित संपूर्ण क्रिया करण्यासाठी शास्त्रशुद्ध विधी सांगण्यात आले आहे.गेलेल्या आत्म्यासाठी चौदावीपर्यंत संपूर्ण क्रिया या आधी घाटावर व नंतर नदीच्या किनारी पार पाडले जातात मात्र करोनाच्या महामारीच्या काळात कदाचित गुप्ता नावाच्या या सधन कुटुंबियांना दारावर खासगी कारांचा ताफा उपलब्ध असताना देखील या संपूर्ण विधी पार पाडण्याकरीता त्यांच्याच वस्तीतील मुख्य रस्त्यावरील शिवमंदिराशिवाय इतर ठिकाण उपयुक्त वाटले नसावे.
विषेश म्हणजे या सर्व विधी करणा-या पुजा-याला देखील करोनाची अतोनात भिती वाटत असावी त्यामुळे या संपूर्ण क्रिया करण्यासाठी त्यांनाही नदीजवळ जाण्याऐवजी मोक्ष्ाची दैवत असणा-या, भर वस्तीतील शिवमंदिराशिवाय इतर जागा योग्यच वाटली नसावी.
आज नागपूरातील सर्वच दहन घाटांवर शेकडो अंत्यसंस्कार पार पडतात आहेत.करोनाच्या काळात देखील मृतकाचे कुटुंबिय हे दूस-या दिवशी अस्थी सावडायला दहन घाट गाठतात.अंभाेरासारख्या ठिकाणी विधिवत अस्थी विसर्जित करतात,नववा-दहावा,बारावा,तेरवी आणि चौदावी या विधी शास्त्रात विशिष्ट ठिकाणीच केल्या जाव्या असे उपदेश आहेत मात्र करोनाच्या भितीदायक काळात आता नागपूरात काही कुटुंबिय हे सरळ-सरळ भर वस्तीत या क्रिया पार पाडून इतरांच्या मनात धडकी भरवीत असल्याचे दृष्य उमटले आहे.विशेष म्हणजे या सर्व विधी सुरु असताना मुख्य रस्त्यावरुन संपूर्ण वाहतूक सुरु होती.
नोव्हेंबर २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यासने रस्त्याच्या कामासाठी शिवमंदिराची प्रशस्त सुरक्ष्ा भिंत पाडली मात्र जेवढी घाई नासुप्रने ही भिंत पाडण्याची केली तेवढीच या ठिकाणी रस्ता बनवण्याची केली नसल्याने आता या शिवमंदिरात अश्याप्रकारे अंत्यविधीचे संस्कार पार पाडण्याची चांगलीच मोकळीक येथील काही नागरिकांना मिळाली असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.गुप्ता कुटुंबियांचा पायंडा बघून या वस्तीतील इतर ही नागरिक आता याच ठिकाणी अस्थी कळस लटकवून ठेवतील.दहावा,तेरावीचा कार्यक्रम पार पडतील,अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
या भागातील नगरसेवक मनोज गांवडे,विशाखा बांते या नगरसेवकांकडे देखील येथील नागरिकांनी याची तक्रार केली असता ’आम्ही काय करु शकतो’असे चमत्कारीक उत्तर मिळाले असल्याचे येथील नागरिक सांगतात.
या भयाण गोष्टीची नागपूर सुधार प्रन्यासने त्वरीत दखल घेत चुकीचा पायंडा पाडणारी ही बाब त्वरीत थांबवावी,ज्या रस्त्याच्या कामासाठी भिंत तोडण्यात आली,तो रस्ता त्वरीत बांधावा अशी मागणी येथील सर्व सुजाण नागरिक करीत आहेत.माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे शुक्लानगर रहीवाश्यांनी लिखित स्वरुपात तक्रार केली होती त्यांनी ही तक्रार भूतकर यांच्याकडे ३० डिसेंबर रोजी मुंढे यांनी वर्ग केली मात्र अद्याप याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
गेल्या दोन वर्षांपासून येथील नागरिकांना या न बनलेल्या रस्त्या अभावी शताब्दी चौकाकडून खूप लांब फेरा मारुन आपल्या वस्तीत येण्याची शिक्ष्ा भोगावी लागत आहे.