उपराजधानीराजकारणव्यापार- वाणिज्य

विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य: गडकरी

मत्‍स्‍योत्पादनावर झाले मंथन

नागपूर,२९ जानेवरी २०२४ : ‘विदर्भात खारे आणि गोडे असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहेत. येथे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी २००० कोटींची निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सव-ॲडव्हांटेज विदर्भच्या तिसऱ्या दिवशी मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र झाले. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते.

व्यासपीठावर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र वायडा, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त पुल्केश कदम, प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे, सीआयएफईच्या प्राध्यापिका अर्पिता शर्मा, एटूएसटू एंटरप्रायजेसचे सहसंस्थापक अमोल साळगावकर, एमएम फिश सीड कल्टिव्हेशन प्रा. लिमिटेडचे संचालक सुखदेव मंडल, ऑस टेक इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम देशमुख यांची उपस्थिती होती.

पुल्केश कदम यांनी शोभिवंत माशांचे उत्पादन कमीत कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देणारे असल्याचे सांगत पारंपरिकत मत्स्योत्पादनाला प्रक्रिया उद्योगांची जोड देण्याची गरज व्यक्त केली. विक्रम देशमुख यांनी मॉडर्न अॅक्वाकल्चर प्रॅक्टिसेसबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रादरम्यान मत्स्यशेतीवर दीर्घकाळापासून संशोधन करणारे डॉ. उल्हास फडके यांच्या ‘इकॉनॉमिक्स ऑफ इनलँड फिशरीज’ या पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. चर्चासत्राचे संचालन डॉ. प्रकाश मालगावे यांनी केले.

तलावांची व्हावी स्वच्छता –
पारंपरिक मत्स्यशेती करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे यांनी ज्या तलावांचे वय ४० ते ५० वर्षे जुने आहे त्या तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तलावातील गाळ काढल्यास मत्स्यशेती अधिक दर्जेदार होईल याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मागणीच्या तुलनेत मत्स्यबीजांचा पुरवठा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *