कुटुंबातील महिलेच्या हाती हवी दुग्धोत्पनाची कास
दुग्धोत्पादन समूह चर्चेतील सूर
नागपूर,२९ जानेवरी २४: ज्या प्रमाणे घरात नवा पाहूणा आल्यानंतर आपण त्याचे स्वागत करतो, स्वच्छता ठेवतो तसेच पशूधनाचेही असते. तुम्ही तुमच्या घरातील दुभत्या जनावरांना जितका जीव लावाल, जितकी त्याची काळजी घ्याल तितकी त्याची उत्पादन क्षमताही वाढते. दुभत्या जनावरांच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू पडते. त्यामुळे कुटुंबातील महिलेच्या हाती जर दुग्धव्यवसायाची कास आली तर निश्चितपणे पूर्वीच्या तुलनेत दुग्धोत्पादनाचा टक्का वाढेल, असा सूर सोमवारी येथे उमटला.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेनेतून साकारत असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सव एडव्हान्टेज विदर्भच्या समारोपाच्या दिवशी सोमवारी विदर्भातील दुग्धोत्पादन आव्हाने- संधी आणि विकास या विषयावर समूह चर्चा घेण्यात आली.
घरातील महिला जशी पशूधनाची प्रेमाने काळजी घेते, तसा पुरुष घेऊ शकत नाही, असे सुरुवातीलाच नमूद करीत कृष्णा डेअरीचे संचालक विलास काटेखाये म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. तेथील दुग्धोत्पादन राज्यात सर्वाधिक असण्यामागे हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे दुग्धोत्पनाचा व्यवसायही मातृत्वाच्या भावनेने करण्याची गरज आहे. यावर आणखी भाष्य करताना चितळे डेअरीचे इंद्रनिल चितळे म्हणाले, विदर्भातील् दुग्धोत्पदकांनी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दुग्धोत्पनाइतकेच दुग्धजन्य पदार्थांनाही महत्व आहे. द्रव स्वरुपातल्या दुधाला भाव मिळाला नाही तरी दुग्धजन्य पदार्थांचा विचार करून दुग्धोत्पदकांनी पर्यायी उत्पन्नाच्या साधनांचा विचार केला पाहिजे.
मदर डेअरीचे मुकेश झा म्हणाले, दुग्धोत्पनात गोठ्याची स्वच्छता याला देखील महत्व आहे. गाय अथवा म्हैस जिथे सर्वाधिक काळ आपला वेळ घालवते तिथले वातावरण निर्जंतूकीकरण आणि स्वच्छ असेल तर निश्चितपणे दुधाच्या सरासरीत वाढ होते. यावेळी मोहन श्रीगीरीवार, हैदराबाद येथील डॉ. फिरोज अहमद, ड़ॉ, सुधीर धोटे यांनीही विचार व्यक्त केले.