उपराजधानीशैक्षणिक

हरित पृथ्‍वी ही काळाची गरज : डॉ. संजय दुधे

एलएडी कॉलेजमध्‍ये ‘ग्रीन अर्थ – क्लिन अर्थ’ वर राष्‍ट्रीय परिषद संपन्‍न

नागपूर, १० फेब्रुवारी २०२४ : पृथ्‍वीवर मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, वायूप्रदूषण झालेले असून त्‍यासाठी सर्वस्‍वी आपण जबाबदार आहोत. प्रदूषणाच्‍या विपरीत परिणामांपासून स्‍वत:चा बचाव करायचा असेल पृथ्‍वी हरित आणि स्‍वच्छ करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले.

एल. ए. डी. आणि श्रीमती आर. पी. महिला महाविद्यालयाच्‍या नियोगी सभागृहात शनिवारी ‘ग्रीन अर्थ – क्लिन अर्थ’ विषयावर राष्ट्रीय परिषद पार पडली. परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्‍या हस्‍ते झाले. मंचावर संचिता जिंदाल, माजी सल्लागार (शास्त्रज्ञ G), पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्‍यासह वुमेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ. पूजा पाठक, उपप्राचार्य डॉ. किरण पाटील व डॉ. रिजूता बापट, संयोजक डॉ. दीपाली चहांदे यांची उपस्‍थ‍िती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ई-प्रोस‍िडींग चे प्रकाशन करण्‍यात आले. नागपुरात झालेल्‍या ढगफुटीमुळे एलएडी कॉलेजचे झालेले आर्थिक नुकसान यावर एक माहितीपट प्रदर्शित करण्‍यात आला. परिषदेत देशभरातून आलेले १५० संशोधक सहभागी झाले होते.

पर्यावरणाविषयी विद्यार्थ्‍यांमध्‍ये जागरुकता निर्माण करण्‍यासाठी कॉलेजतर्फे केल्‍या जात असलेल्‍या प्रयत्‍नांचे डॉ. संजय दुधे यांनी कौतुक केले. पूजा पाठक यांनी स्‍वागतपर भाषण केले तर दिपाली चहांदे यांनी परिषदेच्‍या संकल्‍पनेसंदर्भात विस्‍तृत माहिती दिली.

दुपारच्‍या सत्रात झालेल्‍या तांत्रिक सत्रांमध्‍ये डॉ. विशाल सरदेशपांडे, डॉ. राहूल राळेगावकर, डॉ. उत्‍तरा पांडे व मुकुंद पात्रीकर, प्रवीण मोते व डॉ. अनुपमा कुमार यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन लाभले. त्‍यानंतरच्‍या सत्रात डॉ. तुतू सेनगुप्‍ता, डॉ. नंदा राठी, डॉ. संगीता सहस्‍त्रबुद्धे यांनी शोधनिबंध सादर केले.

समारोपीय सत्राला वन संरक्षण विभागाच्‍या श्रीलक्ष्‍मी अन्‍नाबथुला व वुमेन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख यांची विशेष उपस्‍थ‍िती होती. यावेळी पर्यावरण क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या तनवीर म‍िर्झा, आनंद भवाळकर व प्रशांत वानखेडे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. मृणालिनी ठोंबरे यांनी अहवाल सादर केला. म‍िनाक्षी कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व आयुषी देशमुख व स्‍वरूपा धामणकर यांनी सरस्‍वती वंदना सादर केली. सहसंयो‍जक प्रचिती बगाडे यांनी आभार मानले.

भारत ‘ई-वेस्‍ट’ मध्‍ये तिसरा – संचिता ज‍िंदल
पर्यावरणाच्‍या सर्व समस्‍या उपभोगवादाशी संबंधित असून पृथ्‍वीवरील स्‍त्रोतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताची लोकसंख्‍या भरमसाठी वाढत असून त्‍यामुळे कच-याचे प्रमाणही वाढत आहे. जगात प्‍लॅस्‍टीक कचरा निर्माण करण्‍यात भारताचा पाचवा तर ई-वेस्‍ट तयार करण्‍यात तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती संचिता जिंदल यांनी दिली. ‘वेस्‍ट मॅनेजमेंट फॉर क्लिन अँड ग्रीन अर्थ’ विषयावर त्‍या मुख्‍य भाषण करीत होत्‍या. यावर शाश्‍वत कचरा व्‍यवस्‍थापन, पुनर्वापर, ‘टेक-मेक-मेक’ हे आर्थिक चक्र हे उपाय फायदेशीर ठरू शकतात, असे त्‍या म्‍हणाल्‍या. त्‍यांनी भारत सरकारच्‍या पर्यावरण मंत्रालयाद्वारे सुरू असलेल्‍या विविध पर्यांवरण संवर्धन विषयक योजनांची माह‍िती दिली.

आजचा जो हा उपक्रम होता “ग्रीन अर्थ क्लीन अर्थ”या परिषदे मध्ये आम्हाला अनेक महत्वपूर्ण आणि तितक्याच नवीन गोष्टी शिकण्या सारख्या होत्या.या परिषदे मध्ये जितके पण मान्यवर आणि तज्ज्ञ वक्ते यांनी मार्गदर्शन केले त्यातून आम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.सर्वात महत्वाची बाब म्हणजे पृथ्वीचं संरक्षण आणि संवर्धन ही इतरांची जबाबदारी नसून स्वतःची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांचे हे आवाहन अगदी ठोस पणे मी माझ्या मनावर बिंबवले असल्याचे एल.ए. डी.कॉलेजच्या प्राचार्य डॉ.पूजा पाठक यांनी खास “सत्ताधीश”सोबत बोलताना सांगितले.हेच आवाहन आम्ही आमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू,असे त्या म्हणाल्या.

कशा प्रकारे आपण सगळे मिळून ही पृथ्वी वाचऊ शकतो अश्या वेगवेगळ्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या.एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या परिषदेच्या निमित्ताने ऐकण्यास आम्हाला मिळाले ,हे आमच्या पर्यावरण संबंधी ज्ञानात भर घालणारे होते.

या साठी आयोजन समितीचे मी अभिनंदन करते त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या हे आयोजन पार पाडले.त्यांनीच वक्ते यांची सूची तयार केली होती आणि आज त्या वक्त्यांनी जे ज्ञान दिलं ‘ते आमच्यासाठी व आमच्या विद्यार्थिनीसाठी फार फार मोलाचं होतं,असे डॉ. पाठक यांनी सांगितले.महाविद्यालयाचे व्यवस्थापक यांनी देखील फार मोलाचे सहकार्य केले असल्याचे सांगून डॉ. पाठक यांनी त्यांचे आभार मानले.

या प्रसंगी बोलताना वूमेन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.अविनाश देशमुख म्हणाले की,आज ची परिषद बौद्धिक पर्वणीच होती.सर्व मान्यवर वक्त्यांना ऐकून खूप आनंद झाला.संपूर्ण चमूनी जी मेहनत घेतली,अगदी प्राचार्या पासून तर मेंनेजमेंट पर्यंत,विविध समित्या,आमच्या महाविद्यालयाच्या एनएसएस, एनसीसी च्या विद्यार्थिनी पर्यंत सर्वांनी जी मेहनत घेतली ती कौतुकास्पद असून सर्वांचे परिश्रम सार्थकी लावणारी ठरली,असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *