उपराजधानीराजकारण

देशात नरेंद्र राज्यात देवेंद्रने जनतेची केली खरी सेवा: पियुष गोयल

पूर्वीपेक्षा जास्त बहूमताने देवेंद्र सरकार येणार निवडून

नागपूर: समाजसेवेतून राजकारण करण्याची परंपरा ही आम्हाला नानाजी देशमुखजयप्रकाश नारायण यांच्याकडून मिळाली आहे. वयाच्या ६५ वर्ष पूर्ण होणार असल्याने नानाजी देशमुखांनी १९७८ साली मंत्री बनण्यास नकार दिला व समाजसेवेतून राजकारण करण्याचा मार्ग दाखवला. देशातील नरेंद्र तर राज्यातील देवेंद्र सरकार हे देखील हा संकल्प घेऊन विकासाचे राजकारण करीत आहे. शौचालयापासून तर आरोग्यापर्यंत प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखमय करण्यासाठी झटत आहे. केंद्र तसेच राज्यातील सरकार हे प्रामाणिक आहे, संकल्पित आहे, प्रेरणादायी नेर्तृत्वाच्या डबल इंजिनच्या रुपाने फडणवीस यांनी नागपूर व महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली असून ’केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र’ सरकार हेच महाराष्ट्रातील जनतेला चांगले भविष्य देऊ शकेल, त्यासाठीच जनताही त्यांना भरभरुन आर्शिवाद देणार आहे व पूर्वीपेक्षा ही जास्त बहूमताने देवेंद्र सरकार महाराष्ट्रात निवडून येणार असल्याचे भाकित रेल्वे व वाणिज्य मंत्री पियुष गाेयल यांनी वर्तवले.

ते हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते. यावेळी मंचावर शहराध्यक्ष् प्रवीण दटके, मा.खा.अजय संचेती,आ.अनिल सोले, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. शहरातील व्यापारी वर्गासोबत ‘राष्ट्रीय संवाद’ श्रृखंलेसाठी गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी नागपूरला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले,की नरेंद्र व देवेंद्र सरकार हे प्रत्येक वर्गाचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी ’नव्या भारताचा’निर्माण करीत आहे.वीज,गॅस, नळ जोडणी, रस्ते ते आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखमय करण्यासाठी ते झटत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबांना आणि उद्योगांना देवेंद्र यांच्या नेर्तृत्वात उज्जवल भविष्य असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेश,उत्तराखंड सारखेच महाराष्ट्रातही युती सरकार बहूमताने निवडून येईल ऐवढंच नव्हे तर विरोधी पक्ष् नेता बनविण्या इतपत देखील जागा विरोधकांना महाराष्ट्रातही मिळणार नसल्याचे ते म्हणाले.

‘फिर एक बार ईमानदार सरकार’ यावर जनताच शिक्कामोर्तब करणार असून विकासाने प्रेरित सरकार, उज्जवल भविष्य देणारी सरकार नागपूरचे मतदार निवडून आणनार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. विजयाचा शंख हा नागपूरमधूनच वाजणार असल्याचे ते म्हणाले.नागपूरमधील ६ तसेच जिल्ह्यातील ६ अश्‍या १२ ही जागा युती सरकार शत-प्रतिशत जिंकणार असून यासाठी मतदारांनीही शत-प्रतिशत मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले.

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष्-
तीन मोठ्या मंत्र्यांचेच तिकीट पक्षाने का कापले?या प्रश्‍नाचे उत्तर देताना भारतीय जनता पक्ष् हा कार्यकर्त्यांचा पक्ष् असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: अनेक दशक कार्यकर्ताच राहीले आहेत, वयाच्या ४४-४५ सा व्या वर्षी त्यांना पद मिळाले, मोदी हे आयुष्यभर कार्यकर्तेच राहीले, चहा विकणारा कार्यकर्ता हे आता या वयात पंतप्रधान पदी पोहोचलेत. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या काळात कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी दिली जात असल्याचे ते म्हणाले. भाजपचा कार्यकर्ता हा पदाच्या लालसेने पक्षात काम करीत नाही,आम्ही समाजसेवेसाठी पक्षात काम करतो. आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी प्रश्‍न विचारला असता,प्रत्येक पक्षाला पक्षाची ताकद वाढवण्याची गोष्ट करण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. बंडखोरीच्या प्रश्‍नावर बोलताना,बंडखाेरीला आमच्या पक्षात कोणतीही मान्यता नाही, जो विचारधारेशी जुळलेला आहे असा कार्यकर्ता बंडखोरी करत नाही, काही लोकं हे इतरांच्या सांगण्यावरुन बंडखोरी करीत असले तरी निवडणूकीत त्यांना जनताच धडा शिकवत असते असे ते म्हणाले. जनतेला मोदी किंवा फडणवीस यांनी देशात व राज्यात जी भ्रष्टाचार मुक्त व स्वच्छ छविची जी सरकार चालवली आहे याची जाणीव आहे. बंडखोर हे विकास करु शकत नाही, विकासासाठी पक्षाचे समर्थन आणि पाठबळ हवे असते. मला बंडखोरांची चिंता नाही, उद्धव ठाकरे तसेच फडणवीस यांच्याच या विषयावर चर्चा झाली आहे,तेच बंडखोरांबाबत योग्य तो निर्णय घेतील. महाराष्ट्राची जनता,विदर्भ,नागपूरची जनता यांच्यावर मला संपूर्ण विश्‍वास आहे ते शत-प्रतिशत युतीलाच समर्थन देतील.

‘मिनी मेट्रो’ची देवेंद्र यांची संकल्पना अद् भूतच-
मुंबईतील एका सभेत मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांना ‘मिनी मेट्रो’ची संकल्पना सांगितली. नाशिक सारख्या अनेक शहरात, जिथे लोकसंख्येची वर्दळ नाही तिथे मेट्रो प्रकल्प उपयोगी नसून टायर-२,टायर-३ अश्‍या शहरांसाठी ‘मिनी मेट्रो’ राबवण्यात यावी. मोदी यांना देखील ही संकल्पना खूप आवडली व त्यांनी दिल्लीला येऊन संकल्पना मांडण्याचे फडणवीस यांना सांगितले. याच कामाच्या अनुषंगाने नागपूर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित हे मला नुकतेच दिल्लीला येऊन भेटलेत. पुढील एका महिन्यात ,आचार संहिता संपल्यावर या बाबत निर्णय होईल. फडणवीस सारखा ‘दूरदृष्टि’असणारा नेता महाराष्ट्राला लाभला आहे याचा जनतेला अभिमान वाटायला हवा असेही ते म्हणाले. मूळ महाराष्ट्राची संकल्पना पुढे पूर्ण देशात कार्यान्वित होणार आहे,याचा महाराष्ट्राच्या जनतेने अभिमान बाळगायला हवा.

संघभूमी माझे प्रेरणास्थान-
संघभूमीत येऊन मला नेहमीच प्रेरणा मिळते. आज देखील सरसंघचालकांनी मला वेळ दिला यासाठी मी त्यांचा आभारी आहे. लहानपणापासूनच मी संघाशी जुळलो आहे. मला संघभूमीतून खूप काही नव्याने शिकायला मिळतं.विविध विषयांवरील चर्चेतून मला मार्गदर्शन लाभतं,प्रेरणा मिळते. नुकतेच दसऱ्यानिमित्त सरसंघचालक यांनी भारताच्या शून्य दरात पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य यावर प्रश्‍न विचारला असता, भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत असल्याचे ते म्हणाले.विकास दर गतीने साधल्या जात आहे. अनेक उद्योगात मंदीचा फटका बसला आहे मात्र त्याची काळजी करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या ज्या गतीने निर्णय घेत आहे ते कौतुकास्पद असून पुन्हा एकदा हा देश ७ ते ८ टक्के विकास दर गाठेल,असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात देशात विदेशी गुंतवणूक देखील झपाट्याने वाढेल. मोदींच्या पाच बिलियन डॉलर्सच्या बघितलेल्या स्वप्नात देवेंद्र फडणवीस एक ट्रिलियन डॉलरचा वाटा नक्कीच उचलेल याचा मला विश्‍वास असून दोघांचेही स्वप्न पूर्ण होईल,असे ते म्हणाले. मोदी सरकार हे प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यास तत्पर राहणारी सरकार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *