मंत्रिमंडळ खातेवाटपात “तारीख पर तारीख” कधी संपवणार : आ.कृष्णा खोपडे
नागपूर : महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या विचाराच्या पक्षाने आपले सिद्धांत, आपली विचारधारा, जनतेच्या आशा-अपेक्षा खुंटीला टांगून सरकार स्थापन केले खरे परंतु आधी सहा मंत्री, नंतर प्रत्येकांना दहा-पंधरा खाती, अधिवेशन झाले तेही बिना प्रश्नोत्तराचे, मंत्रिमंडळ विस्ताराला तब्बल एक महिन्याचा विलंब, आता कसेबसे मंत्री नियुक्त झाले, त्यांना बंगलेही वाटप झाले. आता खातेवाटप करिता तारीख पर तारीख देण्यात येत आहे. यावरून असे लक्षात येते की, मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नाही. कुणीतरी रिमोट घेऊन सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत आहे,अशी खोचट प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारच्या खातेवाटप विलंबाबाबत केली आहे.
निवडणूक आटोपून २ महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे. अजून मंत्रालयात कामकाजाचा पत्ता नाही. आता जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही नेमके कोणाकडे जाणार ? निवेदने कुणाला देणार ? याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. शेतकऱ्यांचे मागचेच प्रश्न मार्गी लावले नाही, आता पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरीसुद्धा सरकार ठोस निर्णय घेण्यास सरकार हतबल आहे.
एकीकडे केंद्र सरकारने मोठा पॅकेज देऊन देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मात्र राज्य सरकार मध्ये मुख्यमंत्र्यासह अनेक जबाबदार नेतेमंडळी अजूनही आपल्या मुलांना व नातेवाईकांना सेटल करण्याचाच विचार करीत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात घराणेशाहीला प्राधान्य देऊन हे दाखवून देखील दिले. जमत नसेल तर राजीनामा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.