उपराजधानीसांस्कृतिक

छत्रपती शिवाजी महाराज विदर्भाचेही दैवत: नरेंद्र जिचकार

‘शिवशाही महोत्सवाचे’ थाटात उद्घाटन

नागपूर,१५ फेब्रुवारी २०२४ : नरेंद्र जिचकार आयोजित ‘शिवशाही महोत्सवाचे’ थाटात उद्घाटन झाले.या प्रसंगी महोत्सवात अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील केदार उपस्थित होते,तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉ.परिणय फुके तसेच प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे भोसले घराण्याचे युवराज जयसिंग राजे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना नरेद्र जिचकारांनी सांगितले की,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात शिव जयंती साजरी होते ,तशी विदर्भात मोठ्या उत्साहात साजरी होत नाही.ही खल अनेक वर्षे माझ्या मनात होती.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आपण गणेशोत्सव,दुर्गात्सव दहा दिवसांचा साजरा करतो तो करायलाच पाहिजे पण, छत्रपती शिवाजी महाराज आपले कुलदैवत आहेत. त्यामुळे महाराजांची जयंती सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी व्हायला हवी म्हणून मी प्रण घेतला की शिव जयंती उत्सव सुध्दा दहा दिवस साजरी करायची.हे शिवशाही महोत्सवाचे दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षी चार दिवस आणि या वर्षी सहा दिवस महोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन करताना डॉ. परिणय फुके म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात खूप लढाया लढल्या गेल्या त्यामुळे तिकडे शिव जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.विदर्भात तश्या लढाय्या लढल्या गेल्या नाही.पण शिवशाही महोत्सव सारख्या आयोजनाने विदर्भात सुद्धा शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे याचा खूप आनंद वाटतो.अध्यक्षीय भाषण करताना माजी मंत्री सुनील केदार म्हणाले की, महापुरूषांच्या जयंती फक्त साजरी करून होणार नाही.जो पर्यंत आपण महापुरूषांच्या विचारांना आपल्या आयुष्यात रूजवणार नाही तोपर्यंत काही ही बदल होणार नाही.युवा पीढीला महापुरूषांचे विचार समजावून सांगण्याची जबाबदारी आपली आहे.शिवशाही महोत्सवाने ही जबाबदारी घेतली याचा मला आनंद आहे.

महोत्सवात दुपारी साडे चार वाजता दिपाली घोंगे यांनी “राजमाता जिजाऊ”हे एकपात्री नाटक सादर करून जिजाऊचे चरित्र उभे केले.त्यानंतर नितीन बानगुडे पाटील यांनी शिव चरित्रावर व्याख्यान दिले.नितिन बानगुडे पाटील यांनी शिव चरित्र उभे करताना महाराजांनी कसे सर्वश्रेष्ठ स्वराज्य निर्माण केले याचे कथन केले.शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास अत्यंत अभ्यासपूर्ण, भावनिकपणे उभा केला.

छत्रपती संभाजी नगर येथील शिवशाहीर सुरेश जाधव यांनी वीर रसातील पोवाडे सादर केले.कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.शिवशाही महोत्सवाला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला.उर्वरित दिवसांतील सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन या प्रसंगी नरेंद जिचकार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *