उपराजधानीक्राइम

मानकापूर चौकात मृत्यूचा थरार!

अनियंत्रित ट्रकने अर्धा डझन वाहनांना उडवले

चार लोकांच्या मृत्यूची वार्ता:आरोपी ड्रायव्हर घटनास्थळावरुन फरार

ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची घटना असल्याचा उपस्थितांचा दावा 

नागपूर,ता.७ एप्रिल २०२४ : आज रात्री साडे अकराच्या वाजताच्या सुमारास अतिशय वर्दळीच्या   मानकापूर स्टेडियम समोरील उड्डाणपूलाच्या चौकातच एका अनियंत्रित ट्रकने सुमारे अर्धा डझन वाहनांना धडक देत थरार निर्माण केला.या अपघातातील वाहनांची दशा बघता या भयंकर अपघाताची कल्पनाही करु शकत नाही.अनेक कारांची मोडतोड झाली असून त्यात प्रवास करणा-यांची काय स्थिती झाली असावी,याचा विचार करुनच घटनास्थळी जमा झालेल्या लोकांचा थरकाप उडाला.
मूळात उड्डाणपूलांवरुन जड वाहनांना जाण्याची प्रवेशबंदी असताना नागपूरातील सर्वच उड्डाणपूलांवरुन जड वाहने वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरुन चढ-उतर करताना सर्रास दिसून पडतात.मात्र,त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

अनियंत्रित झालेला हा ट्रक देखील उड्डाण पूलावरुन वेगाने खाली उतरला असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.इतकंच नव्हे तर आरोपी ड्रायव्हर हा मद्य पिऊन असल्याची चर्चा आहे.या घटनेत किती वाहनांचे नुकसान झाले तसेच किती लोक मृत्यूमुखी पडलेत,याची कोणतीही अधिकृत माहीती पोलिस विभागाकडून अद्याप प्राप्त झाली नाही.

नागपूरात शहरभर निर्माण झालेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते,विविध प्रकल्पांसाठी खोदून ठेवलेले अतिशय वर्दळीचे रस्ते,ट्राफिक जाम तसेच दररोज होणा-या दूर्घटना यामुळे घरातून बाहेर पडणारा व्यक्ती सुखरुप घरी परत येण्याची शाश्‍वतीच उरली नाही,मानकापूर दूर्घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले.या दुर्घटनेत एक रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे.घटनास्थळी अतिशय भयावह दृष्य उमटले होते.या दुघटनेत धडक बसलेल्या वाहनांचे व्हिडीयोज सोशल मिडीयावर बघता-बघता व्हायरल झालेत.त्या वाहनांची अवस्था बघताच मनाचा थरकाप उडतो.

आज शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नागपूरात आले आहेत.देशपांडे सभागृहात त्यांनी शिवसैनिकांना संबाेधित देखील केले.यानंतर ते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी लाेकसंवाद यात्रेत सहभागी देखील झाले.यामुळे वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त ताण होता.परिणामी,नागपूरकरांची सुरक्षा ही वा-यावर होती,अशी टिका केली जात आहे.इतक्या मोठ्या दुर्घटनेला नागपूरकरांना सामोरे जावे लागले असून मुख्यमंत्री तसेच केंद्रिय मंत्री यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटूंबियांची तसेच जखमी झालेल्यांची भेट घेऊन प्रशासनाला योग्य सूचना देण्याची मागणी केली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *