उपराजधानीक्राइम

एअर बॅग्स नसते तर….

मानकापूर दुर्घटनेत वाचले प्राण

हेलमेटचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित

नागपूर,ता.९ एप्रिल २०२४ : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोराडी महामार्गावर काल दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री साढे दहाच्या सुमारास घडलेल्या चित्तथरारक अपाघातात तब्बल आठ चार चाकी ,एक ॲमब्यूलन्स तसेच दोन दुचाकी चालकांना भरधाव ट्रेलर चालकाने धडक दिल्यानंतर देखील या दुर्घटनेत कोणीही मृत पावले नसल्याचे वास्तव समोर आले आहे.मानकापूर पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार एवढा भयंकर अपघात होऊन देखील कारमधील एअर बॅग्स ओपन झाल्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला,एवढंच नव्हे तर दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीचालक रस्त्यावर पडले मात्र,हेल्मेट घातले असल्यामुळे त्यांचा देखील जीव वाचला.

या घटनेची फिर्याद स्वप्नील ज्ञानेश्‍वर वानखेडे वय वर्ष ३३ राहणार प्लाट नं. ३०८,रॉयल प्राईड अपार्टमेंट,आर्य नगर,कोराडी रोड,जरीपटका नागपूर यांनी दिली असून, ते त्यांच्या कुटूंबियांसह त्यांची कार क्रमांक एम.एच.३४ बी.आर.८५११ ने महाल येथून कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना कल्पना टॉकिज चौक येथे लाल सिग्नल असल्याने इतर वाहनांसह थांबले असता,त्यांच्या पाठी मागून येणारा ट्रेलर क्र.एम.एच.३४ ए.बी.१७८१ च्या चालकाने नामे विक्रांतसिंग राजेंद्रसिंग वय वर्ष २५,राहणार गाव तुबाडा,ता.घोडहरा,जि.बलिया,उत्तर प्रदेश याने, त्याच्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन चौकात सिग्नलवर उभ्या असणा-या कार क्र.एम.एच.०५ बी.जे ३८३१,कार क्र एम.एच.४० ए.सी ४९०८,कार क्र.एम.एच ४९ पी ७७७७,कार क्र.एम.ए. ३१ एफ.एक्स २२५९,कार क्र.एम.एच ३१ एफ.ई ८१७७,कार.क्र.एम.एच ४९ ए.एस ४९४०,कार क्र.एम.एच ३१ डी.व्ही ४२९९,कार क्र.एम.एच ४० बी.ई ८८१२,ॲम्बुलन्स क्र.एम.एच १४ सी.एल १२६४,दुचाकी क्र. एम.एच २४ बी.एच ३७०६,दुचाकी क्र एम.एच ४० सि.एक्स ८७४८ या सर्व वाहनास मागून धडक देऊन वाहन चालकांना गंभीर व किरकोळ जखमी करुन वाहनांना क्षती पोहोचवली.

या ट्रेलर चालकाने एकूण ८ चारचाकी,२ दुचाकी तसेच एका ॲम्बुलन्सला मागून जबरदस्त धडक दिली.आरोपीस पोलिसांनी अटक केली असता ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असल्याचे आरोपीने सांगितले.

आराेपीची वैद्यकीय तपासणी पोलिसांनी केली असून प्राथमिक अहवालात त्याने मद्य घेतले नसल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे मात्र,वय वर्ष फक्त २५ असताना एवढे जड वाहन ते ही बेदरकारपणे चालवणा-या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पिडीत कुटूंबियांनी केली आहे.

महत्वाचे म्हणजे नागपूरातील उड्डाणपूलांवरुन जड वाहतुकीला बंदी असताना सर्रास पुलांवरुन जड वाहने आवागमन करताना आढळून येतात.मानकापूर चौकात लिबर्टी टॉकिज समोरुन सुरु होणारा हा उड्डाण पूल मानकापूर चौकात उतरतो तेव्हा वाहनांचा वेग हा अमर्याद होत असतो.अशात एवढे जड वाहन पुलावरुन नेले असल्यास नागपूरकर वाहनचालकांचे प्राण धोक्यात आणल्यामुळे, आरोपीवर आणखी कठोर कलमा लावण्यात यावे,अशी मागणी केली जात आहे.

सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्य झाला नसला तरी कोणताही दोष नसताना,आरोपीच्या बेदरकारपणे वाहन चालविण्यामुळे ,अपघातग्रस्त वाहनचालकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली होती,लाखोंच्या कारचे नुकसान झाले ते वेगळे.काल रात्री या घटनेचे व्हिडीयोज सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते.अपघातग्रस्त चार चाकी वाहनांची दूर्दशा बघून प्रत्येकाच्या मनाचा थरकाप उडाला होता.पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पोलिसांना देखील वाहनांची दशा बघून यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जीव गेल्याचे शंका आली.

मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तेथील कुणाल हॉस्पीटल तसेच मेयो रुग्णालयात दाखल केले.दुचाकीधारकाच्या गुडघ्याचे हाड मोडले असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरुन ट्रेलर चालक आरोपीविरुद्ध कलम २७९,३३७,३३८ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरु असल्याची माहिती मानकापूर पोलिस ठाण्याचे उप पाेलिस निरीक्षक देशमुख यांनी दिली.अद्याप आरोपीला जामीन मिळाला नसल्याची माहिती त्यांनी दिली.

मानकापूर चौकात विविध अपघातात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.दर एक दोन दिवसांनी या चौकासह रिंगरोड चौकात लहान-मोठे अपघात होत असतात.मोठ्या अपघातानंतर ही या ठिकाणी अपघात प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत,असा संताप दूर्घटनास्थळी नागरिक व्यक्त करीत होते.रविवारच्या घटनेने या आपघातप्रवण स्थळाची तातडीने वाहतूक विभागासह संबंधित प्रशासनाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
…………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *